राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे आहेत. मात्र, खासदार सुजय विखे हे त्यांच्या खात्यात ढवळाढवळ करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्यातील महसूल विभाग भ्रष्टाचारमुक्त असून, कोणत्याही अधिकाऱयाने शेतकऱयांकडे कामासाठी पैसे मागितले तर त्या अधिकाऱयाची आपण एका दिवसात बदली करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, अधिकाऱयाची बदली करण्याचा अधिकार सुजय विखे यांना कुणी दिला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
जिह्यातील वयोवृद्ध व्यक्तींना शासकीय लाभ मिळण्यासाठी, गरिबांना रेशन काढण्यासाठी, शेतकऱयांना खातेफोड करण्यासाठी कोणत्याही शासकीय अधिकाऱयाला पैसे देण्याची गरज नाही. पुढच्या सहा महिन्यांत हे शासकीय अधिकारी तुमच्या दारात येतील आणि तुमची रखडलेली कामे पैशाशिवाय पूर्ण करतील. कोणत्याही अधिकाऱयाने पैसे मागितले तर माझ्याकडे या आपण त्या अधिकाऱयाची एका दिवसात बदली करू, असे वक्तव्य खासदार विखे यांनी केले आहे.
दरम्यान, राधाकृष्ण विखे-पाटील हे महसूलमंत्री आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून खासदार सुजय विखे यांनीच या पदाचा पदभार घेतला की काय अशी चर्चा नगर जिह्यात जोर धरू लागली आहे. याआधीही खासदार सुजय विखे यांनी नगर येथे महसूल विभागासंदर्भातील बऱयाच विषयांत लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आज केलेल्या या वक्तव्यावरून त्या चर्चेला अधिकच बळकटी मिळाली आहे.