मुंबई: केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन कुटुंबियांना त्रास देण्याचा अत्यंत नीच प्रकार सध्या घडतोय. जर मर्द असाल तर मर्दासारखं अंगावर या, मग बघून घेतो असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलं आहे. ते विधीमंडळात बोलत होते. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे आव्हान दिल्याचं सांगितलं जातंय.
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय ( Budget) अधिवेशनाचा शेवटचा दिवस आज चांगलाच गाजला. त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, “आता एक अत्यंत विकृत पद्धत सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन एकमेकांच्या कुंटुंबियांच्या त्रास दिला जातोय. आम्ही जर का तुमच्यासोबत असतो तर तुम्ही आमच्या कुटुंबियांना बदनाम केलं असतं का? ही अत्यंत निच आणि निंदनीय पद्धत, विकृत अशी गोष्ट सुरू आहे. जर मर्द असाल तर मर्दासारखं अंगावर या, मग बघून घेतो. तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करुन, संस्थाचा दुरुपयोग करुन या गोष्टी केल्या जातायंत. शिखंडीच्या मागे राहून धाडी टाकायच्या याला मर्दपणा म्हणत नाहीत.”
‘हा महाराष्ट्र आहे. धृतराष्ट्र नाही. मी घाबरलो म्हणून बोलत नाही. यातून काहीच होणार नाही. ही संधी आहे, संधीचं सोनं करण्याचे काम आहे. काही सुचना असतील सांगा, कोण गुन्हेगार असेल तर सांगा आम्ही कारवाई करू. पण तुम्हाला सत्ता हवी आहे, म्हणून तुम्ही कुटुंबाला तणावात आणाचे, जामीन मिळू द्यायचा नाही, तुम्हाला सत्ता हवी आहे ना. चला सगळ्यासमोर सांगतो, मी तुमच्यासोबत आहे. उगाच पेनड्राईव्ह गोळा करू नका, पेन ड्राईव्हची गरज नाही. मी तुमच्यासोबत येतो. माझ्याशी वाद आहे ना मग मला तुरुंगात टाका. कुटुंबाशी कुणी बदनामी केली का, मला तुरुंगात टाका. खुलासे करून उपयोग नाही. त्याचे शकुन याला, त्याचे शकून याला. कोर्टात सादर केले जाते. जर एवढाच जीव जात असेल तर मला तुरुंगात टाका मी तयार आहे’ असंही उद्धव ठाकरेंनी सुनावलं.
The way you have attacked my family and (want to) put me in jail…What is the use of exposing all these things? Court sees proof and decides…Put me in jail, I am not Krishna but can you say that you are not Kans?: Maharashtra CM Uddhav Thackeray in the state assembly pic.twitter.com/EX1sfj3kC8
— ANI (@ANI) March 25, 2022
“केंद्रीय यंत्रणा आज ज्यापद्धतीनं काम करत आहेत ते पाहता ही ईडी आहे की घरगडी तेच कळत नाही. मलिकांच्या संपत्तीवर टाच, देशमुखांच्या संपत्तीवर टाच. कुटुंबीयांची बदनामी करायची. हे अतिशय नीच आणि निंदनीय राजकारण आहे. टाचेला मी घाबरत नाही…खबरदार, जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी केंद्रीय यंत्रणांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईवर भाष्य केलं.
सत्तेसाठी जीव जळत असेल तर मला तुरुंगात टाका
“केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन कुटुंबीयांना त्रास देण्याचा प्रकार अत्यंत नीच आणि निंदनीय आहे. ज्या शिवसैनिकांनं ९० च्या दंगलीत आपल्या जीवाची पर्वा न करता हिंदूंच्या बचावासाठी जीवाचं रान केलं. आज त्यांना तुम्ही त्रास देत आहात. मी माझ्या सगळ्या शिवसैनिकांची जबाबदारी घेतो. त्यांना कशाला त्रास देता. मी येतो तुमच्यासोबत. सत्तेसाठी जीव जळत असेल तर मी येतो तुम्ही मला तुरुंगात टाका”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
तेव्हा मलिक, देशमुख चालले असते का?
“दाऊदचा विषय सध्या खूप चघळला जात आहे. रामाच्या नावानं मतं मागून झाली. आता दाऊदच्या नावानं मत मागणार का? दाऊद नेमका आहे तरी कुठं हे काही तुम्हाला माहित आहे का? अमेरिकेत ओबामानं कधी ओसामाच्या नावानं मतं मागितली होती का?”, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. तसंच फडणवीसांनी खरंतर ‘रॉ’मध्ये घेतलं पाहिजे. तिथं जे झटपट प्रकरणं सोडवतील. ज्या नवाब मलिक आणि अनिल देशमुखांवर तुम्ही आरोप करत आहात. त्यांना आज तुरुंगात टाकलं आहे. तेच मलिक आणि देशमुख तुम्हाला पहाटेच्या शपथविधीचा प्रयोग यशस्वी झाला असता तर चालले असते ना?, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.