मुख्यमंत्र्यांनी आधी सोबतच्यांना शिकवावं, मग आम्हाला सांगावं; फडणवीसांचं प्रत्युत्तर –
नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल अनेकांना अनेक गोष्टी उघडण्याची घाई झाली आहे. जरा धीर धरा. राजकारण आपल्या सर्वांचं होतं, पण जनतेचा जीव जातो, अशा शब्दांत भाजपावर टीका केली होती. त्यावर आता भाजप नेते आणि विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री काल बोलले यावर मी काहीही बोलणार नाही. पण समोरच्यांवर बोलण्यापेक्षा आपल्या सोबतच्यांना आणि आपल्या पक्षातल्या लोकांना आधी त्यांनी शिकवावं. मग आम्हाला सांगावं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाविकास आघाडी ही सत्तेचे लचके तोडण्यासाठी तयार झालेली आघाडी आहे. प्रत्येक जण सत्तेचे लचके तोडत आहे. प्रत्येकजण सुभेदार असल्यासारखा वागतोय. प्रत्येकजण लचके तोडण्याचा प्रयत्न करत आहे आणी नाही लचके तोडता आले तर एकमेकांचे लचके तोडा अशाप्रकारची अवस्था या सरकारची झाली आहे, असा घणाघात फडणवीस यांनी केला आहे.
अनिल देशमुख यांना ईडीनं लूकआऊट नोटीस जारी केल्याची माहिती मला माध्यमांमधून कळली. त्यामुळे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट असा सर्व प्रवास झाल्यानंतर आता कायद्याच्या दृष्टीने चौकशीला सामोरं जाणं अधिक योग्य होईल. तशीच भूमिका त्यांनी घ्यायला हवी, असं फडणवीस म्हणाले.