मुंबई | बिडीडी चाळ पुर्नविकास प्रकल्पाचा उदघाटन सोहळा रविवारी जांबोरी मैदान वरळी येथे पार पडला होता. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तोंडभरून कौतुक केले होते.या कार्यक्रमाला महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित होते.
मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रावर सातत्याने काहीना काही संकट येत आहेत. एक मोठं अतिवृष्टीचं संकट आले. हजारो घरांमध्ये पाणी शिरले. होते नव्हते ते वाहून गेले. पण एक गोष्ट चांगली आहे की, या संकटांवरदेखील मात करण्याची हिंमत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवली आणि त्यातून पुनर्विकासाची कामगिरी सुरू झाली, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जाहीर कौतुक केले.
शरद पवार म्हणाले, एका बाजूने या पूरग्रस्त भागांतील घरांची बांधणी करणे हे आव्हान आहे. तर दुसऱया बाजूने समस्त कष्टकऱयांच्या निवाऱयाचा प्रश्न सोडवण्यासाठी आज मोठं पाऊल पडत आहे. हा एक महत्त्वाचा ऐतिहासिक भाग आहे. हा सगळा परिसर याचा इतिहास नुकताच एका ग्रंथाच्या माध्यमातून प्रसिद्ध केला गेला आहे. बीडीडी चाळ व या सर्व परिसरात एका दृष्टीने देशाचाच इतिहास घडला. हा सगळा परिसर महाराष्ट्राच्या ऐक्याचा आणि सांस्कृतिक ठसा व्यक्त करणारा आहे अशा शब्दात त्यांनी मनोगत व्यक्त केले.