मुंबई : विरोधकांनी घातलेल्या गदारोळानंतर आघाडी सरकारलमधील दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. या विरोधात आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आघाडी सरकारचे कान टोचले आहे. गेल्या 36 दिवसांत महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण विरोधी पक्षाच्या हातात गेले आहे का, अशी शंका खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केली आहे.
ठाकरे सरकारने आतातरी विरोधकांच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर द्यायला पाहिजे. अन्यथा विरोधी पक्षांचा खोटेपणा रोज ऐकून लोकांना एक दिवस खरा वाटू लागेल. सरकारचे चारित्र्य हे शेवटी राज्याचे किंवा देशाचे चारित्र्य असते, असे राऊत यांनी सांगितले. या संदर्भात त्यांनी आजच्या सामना अग्रलेखात सविस्तर लिहिले आहे.
फडणवीस सरकारच्या काळात १४ मंत्र्यांवर गंभीर आरोप झाले. पण तेव्हा नैतिकतेने सत्तेशी जणू लव्ह जिहाद पुकारला होता. मात्र, सध्याच्या घडीला विरोधी पक्ष सरकारची प्रतिमा बिघडवण्याची एकही संधी सोडत नाही, तसेच राज्यपालांनी अद्याप १२ नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्त्या केल्या नाहीत, ही बाब खरी आहे. पण दीड वर्ष उलटूनही सरकारने शासकीय महामंडळांचे अध्यक्ष आणि सदस्यपदी तज्ज्ञ आणि आपापल्या कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या केलेल्या नाहीत, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
यासाठी त्यांनी निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या वक्तव्याचा दाखला दिला आहे. शपथ घेतल्या दिवसापासून आघाडी सरकार सापाला दूध पाजतंय. आम्ही सांगून थकलो. आजपर्यंत कायदा विभागातील एक साधा वकील बदललेला नाही. एक नोकर दोन तत्वत: मतभिन्नता असलेल्या मालकाची प्रामाणिकपणे सेवा कशी करु शकतो?, असा प्रश्न कोळसे-पाटलांना पडला असेल तर सरकारने त्याचे समाधान करायला हवे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.