घाटकोपर-मानखुर्द जोड मार्गावरील नवीन उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला झाला असून या उड्डाणपुलाचे रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांचा संपूर्ण राज्याला अभिमान वाटावा असे काम मुंबई महापालिकेने केले असल्याचे गौरवोद्गार उद्धव ठाकरे यांनी आज येथे काढले.
आता याच पुलाच्या नामकरणाचा मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. सदर पुलाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे नामकरण करण्यासाठी स्थानिक खासदार मनोज कोटक यांनी ९ डिसेंबर २०२० ला प्रस्ताव दिला होता, आणि आठ महिन्यानंतर अद्यापही हा प्रस्ताव महापालिकेतच प्रलंबित आहे. आता याच मुद्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोध करताना दिसत आहे.
मोठा गाजावाजा करत सत्ताधारी शिवसेनेने काल पुलाचे उदघाटन केले. मात्र या पूलावर बसवण्यात आलेल्या नामकरण कोनशिलेवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव आहे; परंतू छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवसेना सत्ताधारी उड्डाणपुलास देऊ शकली नाही ही बाब निश्चितच समस्त महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी आहे. या उड्डाणपुलाचे उदघाटन झाले मात्र नामकरण कधी?असा सवाल खासदार मनोज कोटक यांनी केला आहे.