मुंबई : राज्यात कोरोना (Corona) महामारीमुळे हजारो रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे अनेक कुटुंबं उघड्यावर आली. मागील अनेक दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. आता या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५० हजार रुपये सानुग्रह सहाय्य देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून हा निधी देण्यात येईल.
राज्य शासनाने मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्याकरीता ही योजना तयार केली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकास ५० हजार रुपये सानुग्रह सहाय्य दिले जाणार आहे.
राज्य आपत्ती मदत्त निधीमधून ही मदत करण्यात येईल. हे सानुग्रह सहाय्य देण्यासाठी कोरोनामुळे दगावलेल्या नागरिकांची पडताळणी करण्यात येईल. यासाठी विविध मुद्दे शासन निर्णयात सविस्तरपणे देण्यात आले आहेत.
ही मदत मिळविण्यासाठी, कोरोना आजाराने मरण पावलेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाने राज्य सरकारने विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जदार स्वत: किंवा सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत CSC-SPV मधून अर्ज करू शकेल.
या कामासाठी नव्याने वेब पोर्टल पुढील आठवड्यात सुरु करण्यात येणार आहे. त्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज कसा करावा तसेच या योजनेची माहिती आणि कार्यपद्धतीची माहिती असेल. संबंधित सर्वांनी अर्ज करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.