‘देवेंद्र फडणवीस हे सध्याच्या राजकीय व्यवस्थेवर मनापासून समाधानी आहेत काय? या प्रश्नाचे उत्तर आज फडणवीस यांना मानणारेही नीट देणार नाही.
सरकार फडणवीस यांच्यावर लादले आहे व भाजपचे मंत्री मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांना मानायला तयार नाहीत. यापुढे भाजपच्या मोठ्या गटाचे भांडण शिवसेनेशी राहणार नसून ते शिंदे व त्यांच्या गटाशी राहील आणि त्याच अंतर्विरोधातून सध्याची व्यवस्था कोलमडून पडेल, असं भाकित शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वर्तवलं.
अलीकडेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या 40 आमदारांसह गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते. त्यांच्या या दौऱ्यावर संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून हल्लाबोल केला आहे.
चंद्रकांत पाटील व शंभू राजे देसाई या दोन मंत्र्यांना बेळगावात पाठवून काय साध्य होणार? हे वेळकाढूपणाचे धोरण ठरेल. कर्नाटकात आज भाजपचे मुख्यमंत्री आहेत व महाराष्ट्रात भाजपपुरस्कृत शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे सीमा प्रश्न सुटला तर आनंदच आहे, पण त्यासाठी जी हिंमत व धमक लागते ती आपल्या मुख्यमंत्र्यांत दिसत नाही व भाजपचे महाराष्ट्रातील लोक शिंदे यांची मजा पाहत आहेत.