कोल्हापूर | पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान पदी विराजमान झाल्यानंतर स्वातंत्र्याचा अर्थ सर्वांना कळावा, यासाठी त्यांनी सबका साथ सबका विकासचा नारा दिला, यामधील एक घरोघरी तिरंगा होता, त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरी तिरंगा फडकला, असे प्रतिपादन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये केले. मिळालेलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागतील, असेही त्यांनी नमूद केले.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधीक्ष शैलेश बलकवडे, महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे, श्रीमंत शाहू महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास २८ लाख घरांमध्ये तिरंगा पोहोचला. मार्केटमध्ये तर अशी परिस्थिती होती की तिरंगा मिळत नव्हता.
तसेच अनेक ठिकाणी पोलिसांना मध्यस्ती करावी लागली. काही ठिकाणी प्रभात फेरी निघाली, काही ठिकाणी रॅली निघाल्या, यामुळे देशाबद्दल प्रेम आणि जागरूकता निर्माण झाली. देशाला स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाले नसल्याचे ते म्हणाले. हा देश समृद्ध होता, पण इसवी सन १२०० ते १७०० या कालावधीमध्ये या देशाला दृष्ट लागली. या कालावधीत मुघलांचे आक्रमण झाले, त्यानंतर पोर्तुगीज, इंग्रज, डच आले, आणि त्यानंतरचा दीडशे वर्षाचा इंग्रजांचा कालावधी होता.
हा कालखंड संपण्यासाठी मग पंडित जवाहलाल नेहरू असतील, महात्मा गांधीजी असतील, सुभाष चंद्र बोस असतील, सरदार वल्लभाई पटेल असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, क्रांतिकारक सुखदेव, राजगुरू, सुभाष बाबू असतील प्रत्येकाने आपल्यापर्यंत प्रयत्नाने कोणी शांततेच्या मार्गाने कोणी क्रांतिकारी क्रांतिकारी मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आणि शेवटी १५ ऑगस्ट १९४७ आली देश स्वतंत्र झाल्याचे ते म्हणाले.