मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी आपल्या राहत्या घरी फाशी घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या या आत्महत्येनंतर राज्यात आणि देशातील राजकारणात याच विषयाला धरून अनेक घटना घडल्या होत्या. या प्रकरणात त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती तसेच तिच्या भावाला अटक सुद्धा करण्यात आली होती. त्याच प्रमाणे मुंबईत सुरु असलेल्या अमली पदार्थाचे रॅकेट सुद्धा पोलिसांनी उघड केले होते. मात्र आद्यपही हत्या की आत्महत्या या प्रकरणाचा छडा लावण्यात मुंबई पोलीस तसेच केंद्रीय सुरक्षा यंत्रणेला यश आले नाही.
अशात उषा नाडकर्णी यांनी सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सुशांत स्वप्न बघणारा मुलगा होता. अवघ्या २३-२४ वर्षांचा तो मुलगा मोठी स्वप्न घेऊन आला होता. त्यानंतर मालिकांमधून तो सिनेमामध्ये गेला. तिथेही त्याला चांगले सिनेमे मिळाले. त्याला जे हवं ते सगळं मिळत होतं. त्याचे त्यानंतर काय करायचं याचे प्लॅनही होते. असं असणारा सुशांत आत्महत्या करूच शकत नाही, असं उषा नाडकर्णी यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मला खात्री वाटते की त्याला मारलं गेलं असेल, असं थेट मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. सुशांत गेल्याची बातमी आल्यानंतर उषा नाडकर्णी यांना मोठा धक्का बसला होता. मागच्यावर्षी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सुशांतच्या कुटुंबीयांनी बिहार पोलिसांत धाव घेतली. पुढे या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आणि ‘बिहार विरुद्ध महाराष्ट्र’ असा सामना रंगला होता.