ठाणे | राज्य सरकार विरोधात मुंबई महाविकास आघाडीचा महामोर्चा निघणार आहे. तर दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात बंद पुकारण्यात आला आहे. ठाण्यात बस, रिक्षा बंद आहे. तर काही भागात दुकाने ही बंद आहेत. मनसेनं मात्र डोंबिवलीमध्ये या बंदला विरोध केला आहे. या बंदमुळे मात्र चाकरमान्यांचे अतोनात हाल झाले आहे.
हिंदू देव-देवता, संत-महंतांबद्दल व्देषपूर्ण विधानं केल्याचा आरोप करत सुषमा अंधारेंविरोधात बाळासाहेबांची शिवसेना आक्रमक झाली आहे. सुषमा अंधारे यांचा निषेध करण्यासाठी आज डोंबिवली, ठाणे बंद ठेवण्याचा निर्णय सर्व हिंदुत्ववादी संघटना, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने घेतला आहे. या बंदला सकाळपासून सुरुवात झाली आहे. ऐन सकाळी कार्यालयाकडे निघालेल्या चाकरमान्यांना याचा मोठा फटका बसला आहे.
रिक्षा बंद असल्यामुळे बससाठी रांगच रांग लागली आहे. या बंदमध्ये बजरंग दल, सर्व हिंदुत्ववादी संघटना, ज्वेलर्स संघटना, रिक्षा संघटना सहभागी होणार आहे. वारकरी संप्रदायाच्या मंडळींनी अंधारे यांच्या वक्तव्यांचा निषेध केला आहे. ठाण्यात आज कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. अशातच ठाण्यात बस आणि रिक्षाही बंद ठेवण्यात आल्यात. त्यामुळे ठाणेकरांना सर्व ठिकाणी दुकानंही बंद आहेत. ठाण्यातल्या विठ्ठल मंदिरमधून निघणाऱ्या लॉगमार्चमध्ये सहभागी होणार असल्यांचं बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी म्हटलंय.