शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्या – चंद्रकांत पाटील

शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्या – चंद्रकांत पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये सत्तेवर आल्यापासून गेल्या सहा वर्षात शेतकऱ्यांचे आयुष्य सुखी, संपन्न व सुरक्षित होण्यासाठी अनेक योजना राबविल्या असून शेतकऱ्याच्या हिताची जपणूक करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे उभे रहायला हवे, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केले.

श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सुशासन दिवस साजरा करण्यासाठी आयोजित किसान सन्मान मेळाव्यात ते पुण्याजवळ भुगाव येथे बोलत होते. यावेळी खा. गिरीश बापट व भाजपा पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शेतकऱ्यांना होणारे मार्गदर्शन ऐकण्यासाठी भारतीय जनता पार्टीने राज्यात पाच हजार ठिकाणी किसान सन्मान मेळाव्यांचे आयोजन केले आहे. शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जावे लागू नये यासाठी मोदीजींनी पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली. त्यामध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यात एकूण सहा हजार रुपये थेट दिले जातात. गेल्या वर्षी सुरू केलेली ही योजना दहा वर्षे चालणार आहे. या योजनेत देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांना अठरा हजार कोटी रुपये शुक्रवारी देण्यात येणार आहेत.

त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सहा वर्षांमध्ये देशातील शेतकरी सुखी, समाधानी, समृद्ध आणि सुरक्षित करावा यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा म्हणून तीन कायदे केले आहेत. मातीचे परीक्षण करून त्यामध्ये नेमकी किती खते वापरावीत यासाठीच्या सॉईल हेल्थ कार्डपासून सिंचनाचे अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यापर्यंत शेतकऱ्यांसाठी विविध कामे मोदीजींनी केली. ठिबक सिंचनाला प्रोत्साहन, अत्यंत उपयुक्त ठरलेली पीक विमा योजना, युरियाचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी नीम कोटेड युरिया, छोट्या शेतकऱ्यांना साठ वर्षानंतर पेन्शन मिळण्यासाठीची योजना अशा अनेक योजना मोदीजींनी राबविल्या आहेत असे त्यांनी यावेळी बोलून दाखविले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: