मुंबई प्रतिनिधी | एसटी महामंडळ शासनात विलीन करा या मागणीसाठी मागच्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. मात्र अद्यापही विलीनीकरणाचा तिढा सुटलेला नाही.त्यातच या संपावेळी अधिक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या तरीही सरकारने त्यांच्या संपाच्या मागण्या काही मान्य केलेल्या दिसत नाहीत.त्याउलट नवीन कामगारांना कामावर येण्याचे आदेश दिले आहेत.
मात्र या संपामुळे आतापर्यंत १५० कोटीहून अधिक रुपयांचे एसटीचे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील विशेषतः गाव-खेड्यातील प्रवासी वर्ग प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून आहे. देशव्यापी लॉकडाऊननंतर अनलॉक काळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसल्यामुळे एसटीचे मोठे नुकसान झालेले दिसून येत आहे.
संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून जोरदार कारवाई करण्यात आली आहे. आता या संपामुळे महामंडळातील कंत्राटी कामगारांनाही फटका बसला असून २,२९६ रोजंदारी कामगारांना सेवा समाप्तीचा नोटीस महामंडळाने बजावली. त्यामुळे आता कारवाईचा आकडा हा ४,३४९ वर गेला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी कधीही तयार आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर संप मागे घेऊन कामावर रुजू व्हावे, असे आवाहन परिवहनमंत्री अनिल परब यांनी केले.