नवी दिल्ली | सध्या संपूर्ण देशात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे, त्यात अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यातच आता वैज्ञानिकांनी तिसऱ्या लाटे संदर्भात नागरिकांना सूचित केले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसच्या माध्यमातून संवाद साधला होता.
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैज्ञानिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे याबाबत केंद्र सरकारने सावध राहायला हवे. यासाठी आतापासूनच महत्त्वाची पावले टाकावी लागतील. जेणेकरून लहान मुलांना या संकटापासून वाचवता येऊ शकेल, असे मत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्हर्च्युअल बैठकीत व्यक्त केले.
सोनिया गांधी यांनी व्हर्च्युअल बैठकीच्या माध्यमातून पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली. त्या म्हणाल्या की, काँग्रेस नेत्यांनी लसीकरणात आपली महत्त्वाची भूमिका पार पाडावी. राष्ट्रीय स्तरावर लसीकरणाचा दैनिक दर तिप्पट करावा लागेल. म्हणजे यावर्षी अखेरपर्यंत ७५ टक्के लोकसंख्येचे लसीकरण होऊ शकेल. आगामी निवडणुकीसाठी पक्षाचे संघटन मजबूत करावे लागेल, असे सांगून त्यांनी पक्षातील गटबाजीबाबत चिंता व्यक्त केली. पक्ष कमजोर होत असून विरोधक त्याचा फायदा घेत आहेत, असेही त्या म्हणाल्या.