मुंबई | भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेतील वाद शमण्याची चिन्हं दिसत नाहीये. काल नारायण राणे यांना हायकोर्टानं दिलासा दिल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करत शिवसेना पक्षावर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका करण्यात आली होती. तर आज सलग दुसऱ्या दिवशी सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि नारायण राणेंवर टीका करण्यात आली आहे.
सामनात म्हटलं आहे की, नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरून उठवले व अटक केली असे त्यांचे लोक बोलत आहेत. कायद्याला, पोलिसांना सहकार्य केले असते तर ही वेळ आली नसती. राणे यांना जेवणावरून उठवणे वाईटच; पण सिंधुदुर्गात श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे यांना जेवणावरून, भरसंसारातून कायमचे कोणी उठवले याचा नव्याने तपास ‘ठाकरे’ सरकारने करायला हवा. कायद्याचे राज्य मोडण्याचा प्रयत्न करणे हे गांजा मारून पडण्याइतके सोपे नाही. हा महाराष्ट्र आहे, तरीही ‘वर आमचे सरकार आहे! महाराष्ट्र केंद्राशी काय संघर्ष करणार?’ अशी मस्तवाल व महाराष्ट्रविरोधी भाषा राणे नावाचे केंद्रीय मंत्री वापरतात, असं सामनात म्हटलं आहे.
आज सलग दुसऱ्या दिवशी सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि नारायण राणेंवर टीका करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे ‘पर’आत्मा नारायण राणे यांच्यावर कायद्यानेच कारवाई झाली व माणूस ‘नॉर्मल’ असो वा राणेंसारखा ‘अॅबनॉर्मल’ कायदा सगळ्यांसाठी सारखाच हे राज्याच्या पोलिसांनी दाखवून दिले, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.