आज सर्वत्र होळीची तयारी सुरु झाली आहे. होळी आणि रंगपंचमी खेळण्याबाबत राज्य सरकारनं नियमावलीही जाहीर केलीय. कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत आणि बारावीच्या परिक्षा लक्षात घेत राज्य सरकारनं नियमावली जाहीर केली आहे. मात्र दुसरीकडे राज्य सरकारकडून लादण्यात आलेल्या या नियमांना विरोधकांनी कडाडून विरोध केला आहे.
राज्य सरकारच्या नियमानुसार रात्री १०च्या आत होळी पेटवा, असं सरकारनं सांगितलं आहे. यावरुन हिंदू सणांना विरोध का? अशी भाजपनं टीका करायला सुरुवात केली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपला खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
सत्ता येत नसल्याने वैफल्य येऊ शकतं, पण ते अशा टोकाला जाऊ नये की आपल्या राज्यात आपल्याच लोकांचे बळी जावेत आणि त्याचेही राजकारण करत सरकारला धारेवर धरता यावं हे चुकीचं आहे. इतकं क्रूर पद्दतीचं, अमानुष राजकारण महाराष्ट्रात यापूर्वी कोणी केलं नव्हतं आणि करु नये, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.