राज्यात सध्या शिवसेनेचे अनेक नेते शिंदेगटाकडे जाताना दिसत आहे. यामध्येच शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडी कडून अटक झालेली आहे. त्यांना अटक झाल्यानंतर प्रवक्ते पदाची धुरा कोण सांभाळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. यासाठी शिवसेनेने आता नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती केली असल्याचे समोर आले आहे.
माहितीनुसार, अरविंद सावंत आणि नीलम गोऱ्हे हे मुंबईतून पक्षाची बाजू मांडणार असल्याचे समजत आहे. तर दिल्लीत प्रवक्तेपदाची जबाबदारी आता प्रियंका चतुर्वेदी यांच्याकडे दिली आहे. प्रवक्तेपदाच्या नियुक्तीसाठी काल हालचालींना वेग आला होता. मुंबईतून अरविंद सावंत आणि दिल्लीतून प्रियांका चतुर्वेदी यांच्या नावाच्या आधीपासूनच चर्चा सुरू होत्या.
तसेच, संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे शिवसेनेला नव्या प्रवक्त्यांची गरज होतीच, आणि त्यामुळेच आता त्यांना ही नियुक्ती करावी लागली आहे. अरविंद सावंत हे जुने शिवसैनिक आहेत. तसेच एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर वेळोवेळी त्यांनी माध्यमाशी पक्षाबद्दलची भूमिका प्रभावीपणे मांडली होती.