शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बंडखोर गटामधील कायदेशीर लढाई सर्वोच्च न्यायलयात सुरू असताना दुसरीकडे निवडणूक चिन्हाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले असताना शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांनी महत्त्वाचं वक्तव्य केले आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह कोणाकडेही जाणार नसल्याचे स्पष्ट करताना याबाबतची लढाई आता निवडणूक आयोगाकडे होईल असेही त्यांनी म्हटले. मात्र, त्यासाठी अजून बराच वेळ असल्याचेही त्यांनी म्हटले. सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत दिलेल्या निर्देशानंतर अनिल परब यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.
अनिल परब यांनी म्हटले की, विधीमंडळ सचिवालयाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. त्यानुसार, नवीन अध्यक्षांची निवड झाली आहे. त्यामुळे आमदार अपात्रतेचा निर्णय ते घेतील. त्यामुळे याचिका निकाली काढावी असे म्हटले होते. सध्याचे विधानसभा अध्यक्ष भाजपचे आहेत. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली.
त्यानुसार, आमच्या सुप्रीम कोर्टात तीन याचिका प्रलंबित आहेत, त्यावर निर्णय येईपर्यंत आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी घेऊ नये अशी मागणी केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेबाबत याचिकांवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोणताही आदेश न देण्यास सांगितले आहे. आम्ही दाखल केलेल्या याचिकांमधील सगळे मुद्दे सुप्रीम कोर्टात येतील. शिवसेनेच्या सर्व याचिकांवर सुनावणी झाल्यानंतर अपात्रतेवर कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले.