शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षातील ४० आमदारांसोबत मिळून सरकार स्थापन केले आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हदेखील काढून घेण्याचा प्रयत्न होणार असल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भातच कायद्याने जो काही लढा द्यायचा तो देऊच, पण दुर्दैवाने कायद्याच्या लढाईत अपयश आले तरी गाफील न राहता शिवसेनेला जे नवे चिन्ह मिळेल ते कमी वेळेत घरोघरी पोहोचविण्यासाठी कंबर कसा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
आता यावरूनच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “शिवसेनाप्रमुखांच्या काळात प्रचंड दबदबा असलेल्या पक्षाची झालेली वाताहत निश्चितपणे आनंददायी नाही. पण उध्दवजी याला जबाबदार फक्त आणि फक्त तुम्हीच आहात…”, असे ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे.
दरम्यान शिवसेनेने १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली असून याला शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर येत्या ११ जुलैला सुनावणी होणार आहे. मात्र अपात्र आमदारांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्यापूर्वीच राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांचे सरकार सत्तेवर आले आहे.