मुंबई | बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाकरे आणि शिंदे गटांकडून एकमेकांवर टीका करण्यात येत आहे. त्यातच शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र लावण्यावरून शिंदे गटाने ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावर खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला खडेबोल सुनावले. शिवसेना अखंड आणि अभंग आहे. देशात शिवसेना ही फक्त आता उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानेच ओळखले जाते.
शिंदेमिंदे यांच्यामुळे शिवसेना ओळखली जात नाही. ही शिवसेना एकच आहे, देशात दुसरी शिवसेना निर्माण होऊच शकत नाही.ज्या लोकांनी शिवसेना संपवण्याची कटकारस्थानं केली आहेत. त्यांना सांगावं वाटतं की आता भविष्य हे फक्त शिवसेनेचे असेल असा विश्वासही संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.राज्यातील राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी शिवसेना संपवण्याची जरी प्रयत्न केला तरी शिवसेना संपणार नाही. कारण ही शिवसेना त्याग आणि बलिदानातून उभा राहिली आहे, असे राऊत म्हणाले.
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, काही लोकं आता वडिलही चोरले जात आहेत. त्यावर संजय राऊत म्हणाले की, लोकं वडिल चोरू शकत नाहीत, ज्या प्रमाणे देवाच्या मूर्ती चोर लोक चोरतात तेव्हा ती लोकं त्या मुर्तीची मंदिर नाही बनवत तर ती लोकं ती देवाची मूर्ती विकत असतात असंही त्यांनी यावेळी सांगितले.