संत-महंतांबद्दल व्देषपूर्ण विधानं केल्याचा आरोप करत सुषमा अंधारेंविरोधात बाळासाहेबांची शिवसेनेनं ठाणे आणि डोंबिवलीमध्ये बंद पुकारला आहे. ठाण्यात बस, रिक्षा बंद आहे. तर काही भागात दुकाने ही बंद आहेत. पण मनसेनं मात्र डोंबिवलीमध्ये या बंदला विरोध केला आहे. शिवरायांचा अपमान झाला तेव्हा का बंद पुकारला नाही, असा सवाल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी विचारला आहे.
हिंदू देव-देवता, संत-महंतांबद्दल व्देषपूर्ण विधानं केल्याचा आरोप करत सुषमा अंधारेंविरोधात बाळासाहेबांची शिवसेना आक्रमक झाली आहे. सुषमा अंधारे यांचा निषेध करण्यासाठी आज डोंबिवली, ठाणे बंद ठेवण्याचा निर्णय सर्व हिंदुत्ववादी संघटना, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने घेतला आहे. या बंदला सकाळपासून सुरुवात झाली आहे. ऐन सकाळी कार्यालयाकडे निघालेल्या चाकरमान्यांना याचा मोठा फटका बसला आहे.
रिक्षा बंद असल्यामुळे बससाठी रांगच रांग लागली आहे. तर सुषमा अंधारेंच्या वक्तव्याविरोधात डोंबिवली बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र या मोर्चाला मनसेनं विरोध केला आहे. सुषमा अंधारेंच्या वक्तव्याचा निषेध करत आहोत.मात्र बंद करून जनतेला वेठीस धरणं चुकीचं असल्याची भूमिका मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मांडत या बंदला विरोध केला.
सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याचा निषेध मात्र बंद करून जनतेला वेठीस धरणे चुकीचे आहे. हा बंद मागे घ्यावा असाच बंद छत्रपती शिवरायांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करताना का केला नाही असा प्रतिसवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी करत डोंबिवली बंदला विरोध केला आहे. त्यामुळे हा बंद कितपत यशस्वी होईल याबाबत शंका आहे.