कोरोनाच्या पाश्वभूमीवर आघाडी सरकारने शिवजयंती निमित्त काही निर्बंध लादले होते. यंदाची जयंती अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले होते. या निर्णयावर आता विरोधकांबरोबर शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
यावर आता शिवप्रेमींनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर, पण शिवजयंतीची मिरवणूक पारंपरिक मार्गाने काढणारच, असा पवित्रा शहरातील शिवजन्मोत्सव मंडळांनी घेतला आहे. सीबीएस येथील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शुक्रवारी सायंकाळी ठिय्या आंदोलनात हा निर्धार व्यक्त करतानाच ठाकरे सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.
शिवजयंतीचा उत्सव आठवडाभरावर येऊन ठेपला असून, करोना संसर्गाला अटकाव करण्यात आरोग्य यंत्रणांना बऱ्यापैकी यश आल्याने आणि बाजारपेठांमधील जनजीवन पूर्वपदावर आल्याने यंदा जयंती उत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी शिवजन्मोत्सव मंडळांनी तयारीदेखील सुरू केली. मात्र सरकारच्या या निर्णयाने सर्वांचा हिरमोड केला आहे. यावर आता शिवप्रेमींनी आक्रमक भूमिका घेतली आहे,
आम्ही करोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळण्यास तयार आहोत. परंतु, मिरवणूक काढू द्यावी, अशी विनंती मंडळांनी केली. मात्र, पोलिसांनी गृह विभागाच्या निर्देशांकडे बोट केल्याने मंडळांचे पदाधिकारी संतप्त झाले. हे पदाधिकारी आणि शिवप्रेमी सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत चालत आले. तेथे जोरदार घोषणाबाजी करीत ठिय्या आंदोलन करण्यात आले. ‘तुमचं आमचं नातं काय.. जय जिजाऊ जय शिवराय…’ ‘कोण म्हणतं देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही…’ अशा घोषणा देत सरकारच्या धोरणाचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला.