नवी दिल्ली | भाजपा सरकार विरोधात विरोधकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यात दोनच दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांच्या याच मुद्द्यावर बैठक झाल्याची चर्चा आता होऊ लागली आहे. २०२४ मध्ये होणाऱया लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशपातळीवर भाजप विरोधातील सर्व पक्षांना एकत्र आणण्याची रणनीती आखली जात असून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील ६ जनपथ या निवासस्थानी यासंदर्भात मंगळवारी दुपारी ४ वाजता बैठक बोलविण्यात आली आहे. ‘राष्ट्रमंच’च्या बॅनरखाली १५ पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मात्र या बैठकीला शिवसेनेचा एकहाती प्रतिनिधी उपस्थित राहणार नाही.
मात्र या बैठकीला शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे भाजपविरोधातील आघाडीपासून शिवसेना फारकत घेतेय का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. त्यावर आता शिवेसनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “शरद पवार आज दिल्लीत राष्ट्रमंचच्या सदस्यांसोबत बैठक घेत आहेत. ते देशाचे मोठे नेते आहेत आणि देशातील नेते विविधं विषयांसंदर्भात त्यांची भेट घेत असतात यात राजकीय, आर्थिक विषयांवर चर्चा होत असते. आजची बैठक सर्वपक्षीय विरोधकांची बैठक नाही. यात सपा, बसपा, वायएसआरसीपी, टीडीपी आणि टीआरएस देखील या बैठकीला उपस्थित नाहीत”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
शरद पवार दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांची आपल्या शासकीय निवासस्थानी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत तीन तासांहून अधिक काळ चर्चा केली होती. त्यानंतर ‘राष्ट्रमंच’च्या नेतृत्वाखाली आज पवारांच्या निवासस्थानी देशातील १५ विविध नेत्यांची बैठक होत आहे. पण या बैठकीत काँग्रेसचेही सदस्य उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे शरद पवार बिगर काँग्रेस भाजपविरोधी महाआघाडीची चाचपण करत आहेत का अशी चर्चा सुरू झाली. पण राज्यात शिवसेना आता राष्ट्रवादीसोबत मांडीला मांडी लावून सत्तेत असताना शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेची दांडी का? असा सवाल उपस्थित केला जात होता. अखेर त्यावर संजय राऊत यांनी संबंधित बैठक विरोधकांची बैठक नसून राष्ट्रमंचच्या सदस्यांची असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.