शिंदे सरकारला घेरण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत आज महामोर्चा काढण्यात येणार आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. अगोदर या मोर्चाला परवानगी नाकारली होती. मात्र नंतर मोर्चाला परवानगी देण्यात आली. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखात भाष्य करत शिंदे सरकारवर टीकेची झोड उडवली.
राऊत अग्रलेखात म्हणाले की, महाराष्ट्रातील सध्याचे सरकार हे घटनाबाह्य पद्धतीने सत्तेवर बसवले गेले आहे. हे सरकार म्हणजे महाराष्ट्राच्या अब्रूचे धिंडवडे आहेत. हे धिंडवडे रोखण्यासाठीच तमाम महाराष्ट्रप्रेमींचा एक अति विराट मोर्चा आज मुंबईत धडकणार आहे. या मोर्चामुळे फडणवीस-शिंदे सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांचे हातपाय लटपटू लागले आहेत. म्हणूनच महाराष्ट्रप्रेमींचा महामोर्चा निघूच नये यासाठी परवानगी नाकारण्यापासून ते अटी-शर्ती लादून अडथळे निर्माण करण्यापर्यंत या लोकांचे रडीचे डाव सुरू आहेत. तरीही अडथळे ठोकरून महाराष्ट्रप्रेमींचा मोर्चा निघणार म्हणजे निघणारच,असे राऊत अग्रलेखात म्हणाले.
काही झाले तरी कर्नाटकचे शेपूट वाकडे ते वाकडेच राहणार. कारण महाराष्ट्रात एक वाकड्या शेपटीचे बेकायदा सरकार सत्तेवर बसले आहे व ते दिल्लीचे गुलाम आहे, अशी टीका अग्रलेखात करण्यात आली.महाराष्ट्राच्या जनतेलाही दिल्लीचे गुलाम बनविण्याचा त्यांचा इरादा आहे. महाराष्ट्र विकून दिल्लीच्या चरणी त्यांना खोकेच अर्पण करायचे आहेत. त्यासाठी छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले अशा दैवतांचे अपमान सहन केले जात आहेत, पण महाराष्ट्राची जनता अपमान सहन करणार नाही. ती वाघाच्या छातीने आणि सिंहाच्या हिंमतीने महामोर्चात सामील होईल, असे राऊत म्हणाले.
आजचा मोर्चा म्हणजे 11 कोटी मऱ्हाठी जनतेच्या भावनांचा उद्रेक आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक गावांतून लोक मुंबईतील मोर्चात सहभागी होऊन महाराष्ट्राचा स्वाभिमान किती प्रखर आहे हे दाखवून देतील. महाराष्ट्रप्रेमींचा मोर्चा का निघत आहे, हे राज्यातील बेकायदा-बेइमान सरकारने समजून घेतले पाहिजे. महाराष्ट्राला दिल्लीश्वरांच्या पायाशी गहाण टाकण्याच्या कारवाया उघडपणे सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला दिल्लीच्या वाटेवरील पायपुसणे बनवणाऱ्या महाशक्तीविरोधातील लढाईचे हे रणशिंग आहे.