नवी मुंबई | माथाडी कामगारांच्या प्रश्नी मार्गी लवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे नवी मुंबईतील APMC मार्केट रात्रीपासूनच बंद पडले आहे. त्यामुळे पहाटे आलेल्या भाजीविक्रेते आणि स्थानिकांना याचा मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे, मंत्री दर्जाचे नरेंद्र पाटील यांनी बंद पुकारून सरकारला घरचा अहेर दिला आहे.
माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी माथाडी कामगारांनी लाक्षणिक काम बंद आंदोलन पुकारले आहे. काल रात्रीपासूनच APMC मार्केट चे संपूर्ण व्यवहार पूर्णपणे बंद आहेत.माथाडी कामगारांनी पुकारलेल्या बंदला व्यापारांनी पाठिंबा दिला असून,यात व्यापारी ही सहभागी झाले असल्याचे चित्र मार्केट मध्ये दिसत आहे.
राज्य सरकार आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असून,अनेकवेळा पत्र व्यवहार करूनही काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे आम्हाला आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले असल्याची माहिती माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी दिली. जर यातून काही मार्ग निघाला नाही आणि सरकार जागे झाले नाही, तर राज्यातल्या संपूर्ण APMC मार्केट अनीच्छित काळासाठी बंद केल्या जातील असा इशारा ही नरेंद्र पाटील यांनी दिला.
मात्र आज पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसत आहे. संपूर्ण मार्केटमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत असून, कामगार सकाळी 10 वाजता माथाडी भवनमध्ये एकत्र जमून पुढील रणनीती ठरवतील. त्यामुळे आंदोलनाची पुढील दिशा काय असेल त्यावेळी समजेल. मात्र आता तरी मार्केट बंद पडलेले आहे. यावेळी नरेंद्र पाटील यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप करताना, माथाडी बोर्डात काही खंडणीखोर घुसले असून त्यांना पोलीस सपोर्ट करतात. राज्य सरकारला मोठ्या प्रकल्पात जास्त रस आहे. मात्र माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवण्यात नाही.