मुंबई | शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येताच नव्या सरकारने आदित्य ठाकरे यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अवघ्या दोन महिन्यातच पालिका अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या झाल्याने महापालिका प्रशासनात गोंधळाचे वातावरण आहे. सतत बदल्या आणि कार्यपद्धतीत होत असलेल्या बदलामुळे मुंबईकरांच्या प्रश्नाकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
एकनाथ शिंदे हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला धक्क्यावर धक्के देत आहेत. आता महापालिका प्रशासनातील आदित्य ठाकरे यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करून शिंदे सरकारने शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. धारावी मॉडेल जगप्रसिद्ध करणाऱ्या सहाय्यक आयुक्त किरण दिघावकरांची दोन महिन्यांपूर्वीच जी नॉर्थ वॉर्डमधून भायखळ्याच्या ई वॉर्डमध्ये बदली झाली होती. आता पुन्हा दिघावकरांची बदली पी उत्तर विभाग मालाडमध्ये करण्यात आली आहे .
दरम्यान दुसरीकडे शिंदे, फडणवीस सरकार सत्तते येताच महाविकास आघाडी सरकारने आपल्या कार्यकाळात जे निर्णय घेतले होते त्यातील अनेक निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारने घाईगडबडीत निर्णय घेतले. त्या निर्णयांची अंमलबजावणी करताना काही कायदेशील समस्या निर्माण होऊ नये, म्हणून निर्णयांना स्थगिती देण्यात आल्याचे स्पष्टीकरण शिंदे गटाकडून देण्यात आले आहे.