सरकार केव्हा कोसळेल हे सांगता येणार नाही. सध्या अधांतरी आहे. अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते यावर सर्व अवलंबून आहे. सरकारची निश्चिचता, अनिश्चितता कोर्टाच्या निर्णयावर आहे. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आमदारांमध्ये असंतोष पसरला तर सरकारला त्यावेळीही धोका पोहचू शकतो. प्रत्येकाला अपेक्षा आहे त्यामुळे प्रत्येकाला संधी देणे अवघड आहे. त्यामुळे सरकार कोसळण्यासाठी बरीच कारणे आहे असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाष्य केले आहे.
एकनाथ खडसे म्हणाले की, सरकार ज्यावेळेस बहुमतात असते तेव्हा निर्णय घेतले जातात ते वैध असतात. परंतु काही संकेत, नियम आपण पाळायचे असतात. अलीकडे सरकारमध्ये येणारे संकेत पायदळी ठेऊनच निर्णय घेतो असं चित्र आहे. पण जे सरकार बहुमत असतं त्याचे निर्णय हे कायद्याने मान्यच असतात. काँग्रेस-राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंच्या पाठिशी भक्कम आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून उमेदवार उभा केला जाणार आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच स्व. बाळासाहेब ठाकरेंनी उभ्या आयुष्यात धनुष्यबाणासाठी जी पुण्याई खर्ची केली. धनुष्यबाणानं त्यांनी अनेक निवडणुका जिंकल्या. सत्तास्थाने प्राप्त केली. परंतु दोघांच्या भांडणात धनुष्यबाणही मोडलं, शिवसेना नावही गेले. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना असं नावं आली. पुढच्या काळात या दोघांपैकी कुणाला यश येईल, अपयश येईल हा भाग वेगळा आहे. मात्र परंपरागत पिढीजात पुर्वजांनी कमावलेले नाव आणि चिन्ह दोघांनीही गमावलं आहे असं खडसे म्हणाले.