अदानी प्रकरणात जेपीसी नियुक्त करा अशी मागणी काँग्रेससह सर्व विरोधकांनी केली होती. काँग्रेस या विषयावर अधिकच आक्रमक झाल्याचं चित्र पहायला मिळालं. मात्र अचानक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जेपीसीची आवश्यकता नसल्याचं वक्तव्य केलं. या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उचंवल्या. तर दुसरीकडे शरद पवार आणि गौतम अदानी यांचे जुने फोटो शेअर करत राष्ट्रवादीला ट्रोल करण्यात आले होते.
दरम्यान याबाबत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांना टोला लगावला आहे. पवारांवर प्रतिक्रिया शरद पवारांचा भाजपबाबतचा नूर अचानक पालटलाय, अजित पवार देखील नरमाईची भूमिका घेताहेत भाजप आणि राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? नेमकं कोण कोणाला डोळे मारतंय, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना विचारला असता, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, माझं कोणाच्याही डोळ्याकडं लक्ष नाही.
पुढच्या दीड वर्षात अनेक जण गळून पडतील. भाजपसोबत लढण ही सोपी गोष्ट नाही. खुद्द शरद पवार यांनी बाजू घेतली आणखी काय बोलणार.असं विधान त्यांनी केलं, दरम्यान यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधला आहे. सर्व विरोधी पक्षांना आव्हान आहे की त्यांनी मुद्द्यावर लढले पाहिजे, अजित पवार यांना जे कळले ते बाकीच्यांना कधी कळणार असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मविआ निवडणुका एकत्र लढेल की नाही याबाबत शंका आहे. ते एकत्र लढले तरी आम्हाला फायदा आहे, आणि ते वेगवेगळे लढले तरी भाजपला फायदा असल्याचंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.