मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अखेर 39 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला.यात भाजपच्या 9 आणि शिंदे गटातील 9 आमदारांनी शपथ घेतली. एकीकडे शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केल्याचा वाद सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र, तरीही मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आल्यावरुन शिवसेनेनं ही लोकशाहीची हत्या असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे शरद पवार यांनीही या वादावर भाष्य केलं आहे.
शिवसेनेचं चिन्हं असलेल्या धनुष्यबाणावरून होणाऱ्या वादाकडे शरद पवारांनी लक्ष वेधलं. हे शिवसेनेचं चिन्ह असून; यावरून वाद करणे योग्य नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. ‘धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. एखाद्या पक्षाच चिन्ह काढून घेणं योग्य नाही’, असं म्हणत शरद पवार यांनी जर एकनाथ शिंदे यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर वेगळा पक्ष काढू शकतात असंही सुनावलं. त्यावर, आता देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली आहे.
शरद पवारांनी पक्ष बदलला तेव्हा कायदेच नव्हते. डिफेक्शनचे कायदे कुठे होते तेव्हा, कोणालाही कसेही बदलता येतात. आज कायदे तयार झालेले आहेत. त्यामुळे कायदेशीर लढाई लढावी लागणार आहे, ती एकनाथ शिंदे आणि शिवसेना करत आहे, असे म्हणत शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेल्या पक्षातील चिन्हाच्या वादावर देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका मांडली आहे.