संघर्षानंतर शिंदे फडणवीस सरकार आले आहे. आता विकास थांबणार नाही. मेट्रो तीनचा पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी फायदाच होणार आहे, असा दावा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. मुंबई मेट्रो तीनची चाचणी आज घेण्यात आली, या कार्यक्रमप्रसंगी एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी मेट्रोचे फायदे सांगत असतानाच त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही टोले लगावले.
मेट्रो तीनचा हा प्रकल्प साडे 33 किलोमीटरचा आहे. या भागात कनेक्टिव्हिटी नव्हती. 17 लाख प्रवासी यामाध्यमातून ये-जा करणार आहेत. साडे सहा लाख गाड्या ज्या आता रस्त्यावरून धावणार नाहीत. लाखो लीटर इंधनाची बचत होणार आहे. पर्यावरण तसेच वेळदेखील वाचणार आहे. लोकलचा प्रवास करताना अतिशय त्रास लोकांना होतो. मात्र हा 33 किलोमीटरचा प्रवास आरामदायी होणार आहे, असे शिंदे म्हणाले.
तर फडणवीस म्हणाले की, कांजूरमार्गला स्टेशन केले असते तरी याठिकाणची जागा मोकळी होत होती, असे काही नाही. यासंबंधी मुंबईकरांच्या हिताचा निर्णय तुम्ही घेतला, त्याबद्दल अभिनंदन, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यात राजकारण झाले. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्चही वाढला, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.