ठाकरे गटातील महत्त्वाचे नेते संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. त्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. “संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांचे स्वागत झाले, मुंबई आणि राज्यभरात जो काही उत्साह होता, त्यावरून मला वाटले की, त्यांना स्वातंत्र्य युद्धात आत टाकले होते की काय? त्यांना तर घोटाळाप्रकरणी जेलमध्ये टाकले होते. संजय राऊत एक नंबरचा स्वार्थी आणि आत्मकेंद्रित माणूस आहे. आता जेलमधून आल्यानंतर त्याने स्वार्थीपणा करू नये.” असे ते म्हणाले.
संदीप देशपांडे राऊतांच्या स्वागताविषयी बोलताना म्हणाले की, “यापूर्वी केलेली संजय राऊतांची वक्तव्ये काढून पाहावी. त्यांनी लोकांच्या मनात न्यायपालिकेबद्दल संशय उपस्थित करण्याचा प्रयत्न केला आणि न्यायपालिकेवर विश्वास असल्याचे म्हणत आहे. काल शिवसेनेवाले ‘टायगर इज बॅक’ म्हणत होते. मग मातोश्रीमध्ये कोण राहतो पेंग्विन ? स्वत:च स्वतःला तुम्ही वाघ म्हणता, लोकांनी म्हटले पाहिजे ना.” अशी टीका त्यांनी केली.
प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीभोवतीचे बांधकाम पाडण्यात आले. त्यावरही त्यांनी मत मांडले. “अफजलखानाला पाठिंबा देणारे देशद्रोही आहेत. आक्षेप घेत असणाऱ्या राष्ट्रवादीवाल्यांना अफजलखानाचा जास्त पुळका आहे. आव्हाडांचे चिल्ले-पिल्ले आणि आता शिवसेनासुद्धा त्यात आली आहे. इतिहास कोणीही बदलू शकत नाही. याकूब मेननच्या कबरीवर असलेले बांधकामसुद्धा उखडून फेकले पाहिजे.” असे ते म्हणाले.