मुंबई | केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पक्षाने आयारामांना संधी दिली असल्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र, नाराजी नसल्याचं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं आहे. मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या या सर्व मुद्द्यांवर बाजू मांडत होत्या.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने त्या भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. खासदारकी किंवा मंत्रिपदाविषयी बोलताना त्यांचा गळा गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने दाटून आला. २०१४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळालं. मात्र, खासदारकीची शपथ घेण्याआधीच त्यांचं अपघाती निधन झालं. याविषयी बोलताना देखील पंकजा मुंडेंना गहिवर अनावर झाला.
त्या म्हणाल्या की, मुंडे साहेबांना शपथही घेता आली नाही. ते निवडून आले आणि ३ जूनला ते गेले. गंमतीचा भाग असा आहे की माझ्या आईला पेन्शन मिळते. पण मुंडे साहेबांच्या शेवटच्या टर्मची मिळत नाही. कारण त्यांनी खासदारकीची शपथ घेतली नव्हती. ते शपथ घेण्याआधीच गेले. १७ दिवसांत ते गेले. हे केवढं मोठं घोर दु:ख आहे. प्रीतम मुंडे राजकारणात मिरवण्यासाठी नाही आल्या. त्या लोकांना शांत करण्यासाठी आल्या, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.