उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ ठेवल्या प्रकरणात तब्बल १३ तासांच्यावर सचिन वाझे यांची एनआयए’कडून चौकशी करण्यात आली होती. अखेर १३ तासांच्या चौकशीनंतर वाझे यांना एनआयए कडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आघाडी सरकार तोंडघशी पडले आहे याच मुद्द्यावर आता अभिनेत्री कंगना राणावत हिने टोला लगावला आहे.
कंगनाने ट्विट करून ठाकरे सरकार आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. माझ्या एक्स रेनुसार या मागे मोठे कट कारस्थान असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना सत्तेत येताच सचिन वाझेला निलंबित करण्यात आले होते. पण नंतर त्यांचे निलंबन मागे घेत पुन्हा पदावर नियुक्ती केली गेली. या प्रकरणी सखोल चौकशी केल्यास गाडलेले मुडदेही बाहेर येतील. फक्त एवढचं नाही तर महाराष्ट्र सरकारही कोसळेल” असे तिने म्हंटले आहे.
मागच्या काही दिवसांपाससून कंगना राणावत हिने राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यात तिने मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत नवा वाद अंगावर ओढवून घेतला होता. त्यातच तिच्या मुंबई येथील कार्यालयावर झालेल्या कारवाईला तिने ठाकरे सरकारला दोषी ठरविले होते यावरून मोठा वाद सुद्धा झाला होता.