मुंबई | भारतात पुर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा संगम होणार असून यामुळे राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं महाराष्ट्र, राजस्थान,गुजरात,पश्चिम मध्य प्रदेश या ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलाय. मात्र, या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. दरम्यान, हातातोंडाला आलेलं पीक जाईल या भीतीखाली अनेक शेतकरी आहेत.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात अवकाळी पावसासह मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या गारपीट होण्याची शक्यता आहे. पावसादरम्यान हवेचा वेग वाढणार असून ताशी 40 कि.मी वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे, महाराष्ट्रातील पीक काढणीला आली असल्यानं शेतकऱ्यांना अवकाळी पाऊसामुळं मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
आज पासून तीन दिवस विजांच्या कडकडाटासह जळगाव जिल्ह्यात पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता. हवामना खात्याचा हा अंदाज खरा ठरलाय. जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागात कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस झाल्याचं दिसून आले. ज्वारी, हरबरा आणि गहू काढणीच्या तोंडावर अवकाळी पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांन पुढे पुन्हा एकदा संकट निर्माण झालं आहे.