सत्तेवरून पायउत्तार झाल्यानंतर राष्ट्रवादीमधील धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. विरोधी पक्षनेतेपदी निवड न झाल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नाराज होते. आता त्यांची नाराजीही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचली आहे. लवकरच शरद पवार हे अजित पवार आणि जयंत पाटलांना सोबत बसवून चर्चा करण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर राष्ट्रवादीकडे आमदारांची संख्या जास्त असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद गेले. यावेळी विरोधी पक्षनेतेपदी जयंत पाटील आणि अजित पवार यांच्या नावाची चर्चा होती. पण, अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. विरोधी पक्षनेतेपदी निवड न केल्यामुळे जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा रंगली होती.
आता जयंत पाटील यांची नाराजी शरद पवारांपर्यंत पोहचली. अजित पवार यांना विधानसभा विरोधी पक्षनेते केल्याने जयंत पाटील नाराज आहे. शरद पवार लवकरच दोन्हीं नेत्यांची बैठक घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. विशेष म्हणजे, जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या नियुक्तीला आमदाराचे पत्र ही उशिरा दिल्याने ही नाराजी उघड झाली होती. जयंत पाटील का झाले नाराज? जयंत पाटील हे राष्ट्रवादीमधल्या अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत. सत्तेत असताना जयंत पाटील यांनी गृह, वित्त, ग्रामीण विकास यासह अनेक महत्त्वाची मंत्रिपदं सांभाळली.
जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळाचे गटनेतेही आहेत. जयंत पाटील यांनी अजित पवारांना विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त केल्याचं पत्र विधानसभा अध्यक्षांना दिलं नाही. यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांना दोनदा फोन करून 53 पैकी 36 आमदारांनी स्वाक्षरी करून अजित पवारांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती केली आहे, अशी आठवण करून दिली.