देशात एकीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेकांच्या या संसर्गामुळे नोकऱ्या जाऊन उपासमारीची वेळ आली आहे तर दुसरीकडे केंद्र सरकारने इंधनाच्या किमतीत दरवाढ करून सामान्य नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्र्वादीने इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
२०१४ साली महागाई, भ्रष्टाचार अशा मुद्यांवर भाजपने निवडणूक लढवली होती, जर आम्ही सत्तेत आलो तरी पेट्रोलच्या किंमती आणि महागाई कमी करु अशा घोषणा भाजपने सत्तेत येण्याआधी दिल्या होत्या. मात्र २०१९ ला नरेंद्र मोदींनी पंतप्रधान दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले, मात्र देशातील महागाई कमी व्हायचं नाव घ्यायला तयार नाही, देशभरात पेट्रोलने शंभरी गाठली आहे. याविरोधात मंगळवारी राष्ट्रवादीच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाच्या दरम्यान चाळीसगाव येथील राष्ट्रवादीच्या वतीने चक्क मोटार सायकलची अंतयात्रा काढत आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. देशातील सर्वसामान्य नागरिक सध्या महागाईने त्रस्त झाला आहे, एलपीजी गॅसच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे, मागील ५ महिन्यात गॅस तब्बल १५० रुपयांनी वाढला आहे मात्र तरीही या सरकारला जग येत नाही अशी टीका राष्ट्र्वादीने केली आहे.