भारतीय जनता पक्षाची युती करुन उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असलेल्या
रिपाई अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पक्षाला सुद्धा आता बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. रिपाईचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रतन कदम यांनी रामदास आठवले यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.
रामदास आठवले हे मंत्रिपदासाठी लाचार झाले आहेत. असा लाचार झालेला नेता आम्हाला नको, अशा शब्दांत रतन कदम यांनी आठवले यांचा खरपूस समाचार घेतला आहे. त्यामुळे आता रामदास आठवले स्वपक्षातील नाराजी दूर करण्यासाठी काय पावले उचलणार याकडे, सर्वांचे लक्ष लागले आहे. रतन कदम यांनी थेट आणि बोचऱ्या भाषेत आठवले यांच्यावर प्रहार केला आहे.
रामदास आठवले यांनी जातीयवादी भाजपशी युती केली तेव्हापासूनच आंबेडकरी जनता रामदास आठवले यांच्याविरोधात गेली आहे. पूर्वीचा पँथर वाघ असलेला रामदास आठवले आम्हाला नेता म्हणून हवा होता, मंत्रिपदासाठी लाचार झालेला रामदास आठवले आम्हाला नको आहे. आम्ही भाजपचं मिशन कमळ कधी ही यशस्वी होऊ देणार नाही, असे रतन कदम यांनी म्हटले.