राम मंदिर जमीन घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने केली चौकशीची मागणी

अयोध्या | अयाेध्येतील राममंदिरासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात घाेटाळा झाल्याचा आराेप हाेत असताना याच मुद्द्यावरून देशभरातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. याच विषयावरून केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तरप्रदेशातील योगी सरकारवर घणाघाती टीका होताना दिसत आहे. आता या संपूर्ण प्रकरणाची चाैकशी करण्याची मागणी समाजवादी पार्टी आणि आम आदमी पक्षांपाठोपाठ काॅंग्रेसने केली आहे.

‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी सर्वप्रथम या प्रकरणात भ्रष्टाचाराचा आराेप केला हाेता. व्यवहारासाठी खरेदी करण्यात आलेल्या स्टॅंप पेपरच्या वेळांबाबतही त्यांनी संशय व्यक्त केला. प्रियंका गांधी ट्विट केले की, काेट्यवधी लाेकांनी आस्था आणि भक्तिभावाने ईश्वरचरणी दान अर्पण केले. त्याचा दुरुपयाेग अधर्म आणि पाप असून, लाेकांच्या श्रद्धेचा अपमान आहे. असे ट्विट करून त्यांनी केंद्रावर जोरदार निशाणा साधला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार जमीन १८ मार्च राेजी सुल्तान अन्सारी आणि रवी माेहन तिवारी यांनी कुसुम पाठक आणि हरीश पाठक यांच्याकडून दोन काेटी रुपयांमध्ये खरेदी केली हाेती. हा व्यवहार सायंकाळी झाला हाेता. त्यानंतर पाच मिनिटांमध्येच ट्रस्टने ही जागा १८.५ काेटी रुपयांमध्ये खरेदी केली. अवघ्या काही मिनिटांमध्येच भूखंडाची किंमत एवढ्या प्रमाणात वाढली. मात्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी आराेप फेटाळले आहेत. ते म्हणाले, न्यायालयाच्या निर्णयानंतर येथील जमिनीचे भाव वाढले आहेत. संबंधित जमीन रेल्वेस्थानकाजवळ अतिशय माेक्याच्या ठिकाणी आहे. तरीही बाजारभावापेक्षा कमी भावात जमीन खरेदी केल्याचा दावा राय यांनी केला आहे.

Team Global News Marathi: