राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशाराराज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आल्यामुळं हजारो हेक्टरवरील पिकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, मुंबई आणि परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे.
सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भात या मुसळधार पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानं गडचिरोली, चंद्रपूर या भागातील नद्यांची पाणी पातळी घटली असून, पूरही ओसरला आहे.
मात्र आता पुन्हा एकदा हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानं विदर्भाची चिंता वाढवली आहे. तसेच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.वाशिम जिल्ह्यात सकाळपासून पावसानं हजेरी लावली आहे. सध्या वाशिम जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. त्यामुळं दिवसभर पाऊस सुरु राहण्याची शक्यता आहे.
राज्यात एक जून पासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे 28 जिल्हे आणि 309 गावे प्रभावित झाली असून 83 तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहेत. आतापर्यंत 14 हजार 480 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे 110 नगरिकांनी आपला जीव गमावला आहे तर 218 प्राणी दगावले आहेत. 44 घरांचे पूर्णत: तर 2 हजार 86 घरांचे अशंत: नुकसान झालेले आहे.