साकीनाका येथे महिलेसोबत घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. त्यातच काल झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी महत्वाच्या सूचना केल्या आहेत. यापुढे माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेतली जाणार नाही, हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत. त्यामुळे त्या सुरक्षित राहिल्याच पाहिजेत, यासाठी जे काही करता येईल, अशा उपाययोजनांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे खडसून सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
तसेच या बैठकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेली सूचना मान्य करत पोलिसांना विशेष निर्देश दिले आहेत. यामध्ये इथून पुढे परप्रांतियांची नोंद ठेवण्याचे महत्त्वाचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस खात्याला दिले आहेत. साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन पोलिसांना अतिशय महत्त्वाच्या सूचना दिल्या.
काही दिवसांपूर्वी पत्रकार माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले होते की, राज्यात कुठून परप्रांतीय येतात, कुठे जातात, कुठे राहतात, याची कसलीही नोंद नाही. ती नोंद राहिली पाहिजे, परप्रांतीयांच्या बाबतीची माहिती ही स्थानिक पोलीस स्टेशनकडे पर्यायाने राज्य सरकारकडे असली पाहिजे, असं वारंवार राज ठाकरे आपल्या जाहीर सभांमधून सांगत असतात. राज ठाकरेंची हीच सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्य केली आहे.