मुंबई | मान्सून पूर्व पाऊस जरी कोसळत असला तरीही, पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नका, असं आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केलं आहे. यंदा 99 टक्के पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. मान्सून वेळेपूर्वीच राज्यात दाखल होत आहे, पण पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका असेही दादाजी भुसे म्हणाले. कारण गेल्या काही वर्षांचा अनुभव लक्षात घेतला तर बियाणे, खते व मेहनत वाया जाते. त्यामुळे घाई करु नका, असे आवाहन भुसे यांनी केले.
दरम्यान, यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज 14 एप्रिलला जाहीर केला होता. त्यानुसार यंदा देशात पाऊसमान सामान्य राहण्याचा अंदाज आहे. यंदा देशात चांगला पाऊस राहणार असल्याने शेतकऱ्यांना एका प्रकारचा दिलासा मिळाला आहे. यावेळी देशात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस होणार असल्यानं ही शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. कारण दरवर्षी शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची प्रतिक्षा असते. त्यामुळे सगळे शेतकरी नेमका हवामान विभागाचा काय अंदाज येईल याची वाट बघत असतात.
तसेच जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने 14 एप्रिलला जाहीर केला होता. हा पहिला अंदाज आहे. एकूण पावसाच्या 74 टक्के पाऊस हा जून ते सप्टेंबर या कालावधीत पडत असतो. फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही तर सर्वच नागरिकांसाठी महत्त्वाचा मानला जातो.