बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे राज्याच्या बहुतांशी भागात रविवारी ढगाळ वातावरण झालं होतं. रविवारी पुण्यातही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या.
आजही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट घोगांवत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, 13 डिसेंबरपर्यंत उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता आहे. तुरळक हलक्या पावसासह मुंबईत ढगाळ वातावरण राहील. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज 12 डिसेंबर रोजी दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत तुरळक पावसाचा अंदाज आहे. नागपुरात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे.
याठिकाणी पहाटे हलका पाऊस झाल्याने वातावरणात गारवा वाढला आहे. नागपूर वेधशाळेने आज दिवसभर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला अनेक भागात पाऊसच झाला नाही, त्यामुळे पेरणीला विलंब झाला. पेरणी झाल्यानंतर राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा विदर्भ आणि मराठवाड्याला बसला. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं. त्यानंतर ऐन हातातोंडाशी घास आला असताना पुन्हा अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.