नांदेड येथील सभेत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली. “काँग्रेस पक्षातील नैतिकता संपली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेतील १६ जण बरखास्त झाले; तर नांदेडकर आणि लातूरकर देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीवर बसायला तयार आहेत. ते फडणवीसांना मस्का लावायला तयार आहेत.
तसेचआमचे काहीच शिल्लक राहिले नसल्यामुळे आम्हाला लोकांना उत्तरे देता येत नाहीत, असे कॉंग्रेसवाले म्हणतात. त्यामुळे जे राहिले आहे ते वाचवुया, अशी काँग्रेसची स्थिती झाली आहे.” असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “प्रकाश आंबेडकर भाजपची ‘बी’ टीम आहेत. ते भाजपचे प्रवक्ते असल्याप्रमाणे बोलत आहेत.” असे पटोले माध्यमांशी बोलताना म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यातून हे लक्षात येते की, ते भाजपची बी टीम आहेत. तसेच भाजपचे प्रवक्तेही झाले असून भाजपसाठी काम करत आहेत, असे ते म्हणाले. ‘भारत जोडो’च्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत काँग्रेसचे दोन टप्पे पडलेले असतील, असे भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटले होते. त्यावर बोलताना, काँग्रेसमधून कोणीही सोडून जाणार नाही, असा दावा पटोले यांनी केला.
सुषमा अंधारे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारेंचा ‘नटी’ असा उल्लेख केला आहे. त्यावरही त्यांनी मत मांडले. महाराष्ट्रात ईडीचे भाजपप्रणित सरकार असून महिलांचा सन्मान न ठेवणे हा भाजपचा धर्म आहे, असे ते म्हणाले.