केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या विधानावरून शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले असून शिवसेनेने बँनरबाजी करून नारायण राणेंवर निशाणा साधला आहे.त्यातच आता शिवसैनिक आक्रमक झाले असून पुणे, नाशिक, महाड आणि संभाजीनगरमध्ये शिवसेनेकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच लवकरच राणे यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात येणार आहे.
त्यातच आता शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांच्या प्रतिक्रियेनं हा वाद आणखी चिघळणार असल्याचंं पाहायला मिळत आहे. नारायण राणे अर्वाच्च भाषेचा वापर करुन मुख्यमंत्र्यावर टीका करत आहे. त्यामुळे राणे शिवसैनिकांना डिवचत असून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांच्याकडून केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा मागितला पाहिजे अशी मागणी बडगुजर यांनी केली आहे.
केंद्रीय मंत्र्याला शपथ देताना कोणत्याही राज्याविषयी, नेत्याविषयी आकस बाळगणार नाही, अशी शपथ दिली जाते. नारायण राणे यांनी त्याचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला सांगावा. तसेच नारायण राणेंना केंद्रीय पद मिळालं होतं. त्यामुळे त्यांच्याकडे चांगलं काम करण्याची आणि राजकीय घडामोडी चांगल्या करण्याची एक उत्तम संधी होती. मात्र त्यांनी एक चांगली संधी वाया घालवली आहे, असंही यावेळी बडगुजर यांनी म्हटलं.