नगर : सध्या संपूर्ण देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. आज वाढत असेलेली रुग्णसंख्या केंद्र सरकारच्या चिंतेत अधिक भर घालताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्राच्या ढिसाळ कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि राज्य मंत्री बच्चू कडू यांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या भूमिका बजावायला पाहिजे होत्या, त्या त्यांनी बजावल्याच नाही. त्यामुळे आज जी आपत्ती आली आहे ती देशासोबत राज्यावर येऊन पडली आहे. देशात जर योग्य नियोजन झाले असते तर आज हे दिवस आपल्याला पाहायला मिळाले नसते अशी जोरदार टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बुधवारी अहमदनगरला प्रहार कोव्हिड सेंटरची पाहणी केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली.
तसेच राज्यातील लसीच्या तुटवड्यावर राजकारण करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे प्रमुख आहेत ते मोदींकडे गेले का? आम्हाला लसीकरण जास्त द्या किंवा इतर साहित्य द्या असे एक तरी निवेदन त्यांनी पंतप्रधानांना दिले का? असा सवाल बच्चू कडूंनी उपस्थित केला आहे. तसेच महाराष्ट्रात राहून सरकारवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा ते केंद्रातून काय आणू शकले याचे उदाहरण देवेंद्रजींनी द्यावे, मग त्यांना बोलायचा अधिकार आहे, असा टोला त्यांनी लगावला.