सध्या “हर हर महादेव’ या चित्रपटावरून चांगलेच वाद होताना दिसून येत आहे. या चित्रपटावरून मनसे आणि राष्ट्रवादी यांच्यात देखील चांगलाच वाद निर्माण झाला आहे. नुकतंच ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या चित्रपटाचा मोफत शो ठेवण्यात आला होता.
मात्र, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये जाऊन हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावरून सध्या या दोन पक्षांमध्ये चांगलाच राडा होताना दिसून येत आहे.
दरम्यान, या वादात आता अभिनेते शरद पोंक्षे यांनीही उडी घेतली आहे. शरद पोंक्षे यांनी ‘हर हर महादेव’ चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला संमती दिली असताना त्याला विरोध का केला जात आहे? अशी विचारणा त्यांनी केली आहे. संभाजीराजेंची आपण भेट घेणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.
“चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिली आहे. शासनाने तिथे हुशार माणसं नेमली आहेत. कोणता प्रसंग इतिहासातील कोणत्या प्रसंगावर आधारित आहे याचे पुरावेही त्यांना आपल्या दिग्दर्शकाने दिले आहेत. पण सिनेमा रिलीज झाल्यानतंर दोन आठवड्यांनी अचानक यांना सुचलं का? असं ते म्हणाले.
तसेच, प्रेक्षकांना मारुन चित्रपटगृहातून बाहेर काढलं जात असल्यासंबंधी विचारल्यानंतर ते म्हणाले, हा तर हलकटपणा आहे. म्हणजे सेन्सॉर बोर्डाने संमत केलेला सिनेमा चालू असताना तुम्ही प्रेक्षकांना मारहाण करुन बाहेर काढता.
या विरोध करणाऱ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तसं ते सिनेमा बनवणाऱ्याला नाही का? तुम्ही काय गुंड आहात? आणि स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेतात. शाहू, फुले, आंबेडकर यांनी हेच शिकवलं का? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला आहे.