मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला होता. यावेळी वाढत असलेली रुग्णसंख्या राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यास भाग पडत आहे असे भाष्य मुख्यमंत्र्यांनी केले होते.
याच पार्श्वभूमीवर आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, लॉकडाऊन पुन्हा लावण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय.यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प होतात.याने सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या पोटावर पाय येईल. लॉकडाऊनने कोरोना आटोक्यात येणार नाही,शिस्त पाळणे, फिजिकल अंतर पाळणे गरजेचं आहे. सरकारला आमची विनंती राहील की, लॉकडाऊन करू नये.
लसीकरणात महाराष्ट्र एक नंबरचे राज्य ठरले. काल (१ एप्रिल) एका दिवसात ३ लाख नागरिकांचं लसीकरण केलं. केंद्रानं लसींचा पुरवठा वाढवला तर लसीकरणाची क्षमता एका दिवसात ६ ते ७ लाखांपर्यंत नेऊ. लस घेतल्यानंतरही काही जण करोनानं बाधित होतात, कारण लस घेतल्यानंतरही मास्क घालणं अनिवार्य आहे पण बरेच जण हे पाळत नाहीत.
मी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देत आहे. लॉकडाऊन जाहीर करत नाहीए, पण दोन दिवसांमध्ये परिस्थितीचा आढावा घेऊ. मला आपल्या सहकार्याची अपेक्षा नाही, विश्वास आहे. सर्व राजकीय पक्ष, सर्व धर्मियांचे सहकार्य अपेक्षित आहे. ही लढाई जिंकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज व्हा, असे मुख्यमंत्र्यांनी सागितले आहे.