ठाणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आला. यंदाही कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवल्यानंतर धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने दहीहंडी उत्सवाच्या आयोजनास परवानगी नाकारली आहे. मात्र मनसेनं हा उत्सव साजरा करण्याची भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर आज भगवती मैदानावर मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आंदोलनाला बसले आहेत. मात्र त्यानंतर काही वेळात मनसे पदाधिका-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यानंतर मनसैनिक पुन्हा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. ठाण्यात भगवती मैदानावर मनसैनिक पुन्हा आले आणि ते दहिहंडी साजरी करणारच असं म्हणत पुन्हा उपोषणाला बसले. मात्र काही वेळातच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. आता याच मुद्द्यावरून ठाण्यात राजकारण तापलेले दिसून येत आहे. तसेच राणे यांच्या घराखाली मोठ्या संख्यने आंदोलन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा भाचा वरुण सरदेसाई यांच्यावर सुद्धा जाधव यांनी निशाणा साधला आहे.
मात्र हिंदूंचे सण साजरे करताना कोरोनाचा प्रादुर्भाव होतो का असा सवाल अविनाश जाधव यांनी यावेळी उपस्थित केला आहे. जुहूमधील नारायण राणेंच्या घरासमोर शेकडो शिवसैनिक जमले ते चालतं. मुख्यमंत्र्यांचा भाचा शेकडो लोकांना घेऊन आंदोलन करतो ते चालतं, असंही जाधव म्हणालेत.