भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री सतत वादग्रस्त विधाने करून आपल्या आणि पक्षाची प्रतिमा मालिन करताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्गावरून केलेल्या भाजपा नेत्यांच्या विधानामुळे एकच टीकेची झोड उठली होती. आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातील भाजपा मंत्री उपेंद्र तिवारी यांनी मोदी यांच्या संदर्भात विधान केले आहे.
“नरेंद्र मोदींचा अभिमान बाळगा ते नवयुगाचे निर्माते आहेत. असा महापुरुष या धरतीवर एकदाच येतो. नरेंद्र मोदी कोणी साधारण व्यक्ती नाही, तर देवाचा अवतार आहेत. एका प्रधानसेवकाच्या रुपात आपल्यामध्ये काम करण्यासाठी ते आले आहेत,” असं उपेंद्र तिवारी यांनी म्हटलं आहे. आता त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा विरोधकांना टीका करण्यासाठी चालून संधी मिळाली आहे.
नुकतंच उत्तर प्रदेशातील ‘या’ भाजपा नेत्याने वाढत्या इंधनदारावर बोलताना देशातील ९५ टक्के लोकांना पेट्रोलची गरज नाही असं आश्चर्यकारक विधान केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन जोरदार टीकादेखील करण्यात आली होती. “भारतामध्ये चारचाकी गाड्या चालवणाऱ्या मोजक्या लोकांना पेट्रोलची गरज असते. ९५ टक्के भारतीयांना पेट्रोलची गरज नाही,” असं वक्तव्य उपेंद्र तिवारी यांनी केलं.