“PM मोदी आहेत म्हणून देश वाचला, काँग्रेस असती तर काय झाले असते कुणास ठाऊक – भाजपा 

 

उत्तर प्रदेश : सध्या संपूर्ण देशात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यात मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. मात्र या संकटात सुद्धा देशात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरु असलेली पाहायला मिळत आहे. सध्या वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधलेला असताना आता भाजपाने सुद्धा या टीकेचे सडेतोड उत्तर दिले आहे. उत्तर प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी काँग्रेसवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, म्हणून देश वाचला आहे, असे म्हटले आहे.

 

स्वतंत्र देव सिंह यांनी एका पत्रकार परिषदेत सदर विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत म्हणून देश वाचला, काँग्रेस सत्तेत असती, तर काय झाले असते, याची कल्पना करवत नाही, अशी टीका त्यांनी केली. मात्र, यानंतर सोशल मीडियावर स्वतंत्र देव सिंह यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत असून, ते ट्रोलही झाल्याची माहिती मिळाली आहे. आता त्यांच्या या वक्तव्याचा काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा चांगलाच समाचार घेतला आहे.

कोरोना संकटाच्या काळात रुग्णांना कशा प्रकारे मदत पोहोचवायची, लाभ मिळवून द्यायचे, यासाठी पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ उत्तम प्रकारे काम करत आहेत. परिस्थिती हाताळत आहेत. काँग्रेस हा एक नंबरचा खोटारडा पक्ष आहे. सर्वांना आता हे माहिती झाले आहे. पंतप्रधान मोदी आहेत म्हणून देश वाचला आहे, काँग्रेस असती तर काय झाले असते कुणास ठाऊक, असे स्वतंत्र देव सिंह यावेळी बोलताना म्हणाले. मात्र त्यांच्या या विधानावर नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.

Team Global News Marathi: